लासलगाव (आसिफ पठाण)
लातूर विधी व सेवा दिन हा केवळ औपचारिक दिवस नसून तो लोकशाहीचा आत्मा जागवणारा दिवस आहे, असे मत न्यायमूर्ती व्यंकटेश गिरवलकर यांनी व्यक्त केले. न्याय ही प्रत्येक नागरिकाचा श्वास बनावी, या उद्देशाने त्यांनी ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर आयोजित कार्यक्रमात NCC च्या विद्यार्थ्यांना विधी व सेवा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.
श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. न्यायमूर्ती गिरवलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नरसिंग वाघमोडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष नौगण, ॲडम ऑफिसर कर्नल वाय.बी. सिंह, मुख्याध्यापक प्रवीण खरोसेकर, चीफ ऑफिसर महावीर काळे, सेकंड ऑफिसर नमनगे जगदीश, सचिन गिरवलकर आणि सुभेदार मेजर शंभू सिंग यांची उपस्थिती होती.
संविधानाचे रक्षण
न्यायव्यवस्थेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी ९ नोव्हेंबरला विधी व सेवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नरसिंग वाघमोडे यांनी ‘भारतीय राज्यघटना आणि तिची निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये आणि संविधानाची पायमल्ली म्हणजे लोकशाहीवरचा घाला आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे डॉ. वाघमोडे म्हणाले.
या कार्यक्रमास यशवंत विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चीफ ऑफिसर महावीर काळे यांनी केले, तर आभार जगदीश नमनगे यांनी मानले.


























