भगवान महाविरांचे सुपुत्र केव्हा होणार: प्रबीनऋषीं

भगवान महावीर यांचा पुत्र होणे हेच खरे पुरुषार्थ आहे आणि यामध्येच जीवनाची खरी सार्थकता दडलेली आहे, असा जीवनस्पर्शी आणि मौल्यवान संदेश प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी आपल्या प्रवचनात दिला.
ते म्हणाले की, ‘जेव्हा तुम्ही म्हणाल की ‘मी भगवान महावीरांचा पुत्र आहे’ — तेव्हा हे लक्षात ठेवा की, आपल्या वडिलांचा गौरव वाढवणे हेच पुत्राचे कर्तव्य असते. माझ्या हातून असे कार्य व्हावे, ज्यामुळे जिनेश्वर कुलाची शोभा वाढेल, हीच भावना हवी.
आपण कुलाचा कलंक (कुलांगार) नाही, तर कुलाचा श्रृंगार व्हायला हवे. कैकेयी, मंथरा, जरासंध यांसारखे कुलांगार न बनता, जिनेश्वर कुलाचे खरे वारसदार व्हावे — ही स्मृती सदैव जागृत ठेवा. महावीरांचा पुत्र हा सदा आराधक असतो.
स्वतःशी एक वचन द्या – ‘मी महावीरांचा पुत्र बनेन.’ यामध्येच जीवनाची पूर्णता आहे.
आपल्या मनाशी ठरवा – ‘मी स्वतः कोसळणार नाही आणि इतरांनाही कोसळू देणार नाही.’
त्यांनी हेही सांगितले की, तुमच्या जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त सुखप्राप्ती हेच जीवनाचे ध्येय असू शकत नाही. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे — शिखरावर पोहोचणे, सिद्ध होणे. यासाठी मनःस्थिती, दृष्टिकोन आणि ध्येय यामध्ये परिवर्तन आवश्यक आहे.
सुखाची अतिशय तीव्र इच्छा कधी आपल्याकडून अशुभ कर्म घडवून घेईल हे सांगता येत नाही. म्हणूनच आत्मसंयम अत्यंत गरजेचा आहे. तुम्ही जर संयमी झाला, तर आनंद आपोआप तुमच्या जीवनात येईल.
जर भगवान रामांचे ध्येय फक्त आनंदप्राप्ती असते, तर त्यांनी राज्याभिषेकाच्या क्षणी हसत हसत वनवास स्वीकारला असता का?
म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन घडवा. परिवर्तन करण्याचा अधिकार फक्त माणसालाच मिळालेला आहे, आणि याचा सदुपयोग करायला हवा.
आषाढी पौर्णिमेचे महत्व सांगताना प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. म्हणाले की,
हा दिवस ‘शाश्वत परिवर्तनाचा’ प्रतीक आहे.हा दिवस ‘शाश्वत क्रांतीच्या’ प्रारंभाचा उत्सव आहे. हा दिवस आपल्या संस्कारांमध्ये, चारित्र्यात व आत्म्यामध्ये क्रांती आणि सकारात्मक परिवर्तन घडवण्याची सुवर्णसंधी आहे. या दिवशी अहिंसेचा खरा अर्थ समजून घ्या –‘मी कुणाच्याही जीवनपथात अडथळा ठरणार नाही.’ या भावनेनेच आपल्या जीवनाची दिशा ठरवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *