पावसाने दिला दिलासा, पण लष्करी अळीने वाढवले शेतकऱ्यांचे संकट

आन्वा, प्रतिनिधी :
भोकरदन तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीनंतर झालेल्या खंडित पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाने दिलासा दिला असला तरी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी कायम आहे.

मका हा बाजारातील वाढती मागणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांसाठी पसंतीचे पीक ठरले आहे. गेल्या काही वर्षांत या पिकाखालील क्षेत्रही वाढले आहे. मात्र, लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ करत असून उत्पादनावर थेट परिणाम करत आहे.

गेल्या दोन वर्षांत या किडीचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आला होता. मात्र यंदा (२०२५ मध्ये) पुन्हा या किडीने डोके वर काढले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. पिकांवर अळींचा मारा वाढल्याने पाने कुरतडली जात आहेत आणि उत्पादनात घट होत आहे.

पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने खरीपातील इतर पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला वाढल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मागील दशकात हळूहळू मका लागवडीकडे वळलेले शेतकरी आता उत्पादन घट आणि संरक्षण खर्चामुळे अडचणीत सापडले आहेत.

२०१९-२० मध्ये या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत तीव्र होता. २०२० मध्ये तर पेरणीच्या जवळपास ९० टक्के क्षेत्रावर लष्करी अळीने हल्ला केला होता. त्या वेळी रासायनिक व जैविक फवारण्या करून नियंत्रणाचा प्रयत्न झाला. काही प्रमाणात नियंत्रण मिळाले असले तरी किड पुन्हा उद्रेक करत असल्याने शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *