तिसऱ्या दिवशी मिळाला त्या बेपत्ता दाम्पत्याचा थांगपत्ता..!
*वडनेर भोलजी फ्लायओव्हरजवळील विहिरीतून कारसह दोघांचे मृतदेह*
नांदुरा(सिद्धार्थ तायडे ):तेलंगणातून जळगाव-खान्देश येथे विवाह सोहळ्यासाठी निघालेलं दाम्पत्य पद्मसिंग दामू पाटील (राजपूत) आणि पत्नी नम्रता पद्मसिंह पाटील (राजपूत) 27 तारखेला अचानक बेपत्ता झालं होतं. अखेर तिसऱ्या दिवशी त्यांच्या शोधाला यश आलं. वडनेर-भोलजी फ्लायओव्हरजवळ झुडपांनी वेढलेल्या विहिरीत आज (29 नोव्हेंबर) दुपारी सुमारे 2.20 वाजता कारसह दोघांचेही मृतदेह आढळले.
झुआरी सिमेंट प्रा. लि., सितापुर (तेलंगणा) येथे कार्यरत पद्मसिंह दामू पाटील (राजपूत, 49) हे पत्नी नम्रता (45) यांच्यासह एमएच-13-बीएन-8483 या क्रमांकाच्या कारने खान्देशातील डोंकलखेडा येथे आयोजित विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. 27 तारखेला सायंकाळी सुमारे 6.30 वाजता त्यांचा शेवटचा संपर्क नातेवाइकांशी झाला. त्यानंतर दोघांचेही फोन बंद आले आणि दाम्पत्याचा पूर्णपणे संपर्क तुटला.
दाम्पत्य विवाहस्थळी पोहोचले नाहीत.तेव्हा नातेवाईकांची चिंता वाढली. त्यांनी अनेक गावात शोधाशोध सुरू केली आणि पोलिसांशी संपर्क साधला.y तपासात समोर आले की पद्मसिंह पाटील यांनी कारने 27 तारखेला सायंकाळी 7.11 वाजता तरोडा टोलनाका पार केला होता. त्यानंतर शेवटचे लोकेशन नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी परिसरात दिसले. या आधारे वडनेर भोलजी पोलीस चौकी येथे तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि पोलिसांवर तपासाचा तगादा वाढला. नांदुरा–मलकापूर दरम्यानच्या महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी झाली, मात्र 28 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत काहीच धागादोरा लागला नाही.
29 नोव्हेंबरला सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, डीवायएसपी आनंद महाजन आदी वरिष्ठ अधिकारी नांदुरा येथे दाखल झाले. पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रिय झाले; तरी दुपारपर्यंत निष्फळ शोध सुरूच होता. दरम्यान दुपारी 2.20 वाजता वडनेर फ्लायओव्हरजवळील झुडपांनी वेढलेल्या विहिरीत कारसह दोन्ही मृतदेह दिसून आले. वृत्त मिळताच वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 3.15 वाजता कार आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी 2 क्रेन मागविण्यात आली. नांदुरा येथील ओम साई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना विहिरीत उतरवण्यात आले. आणि उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
हा अपघात नसून हत्या; नातेवाइकांचा आरोप
वडनेर-भोलजी परिसरातील विहिरीत कारसहित दाम्पत्याचे मृतदेह सापडताच नातेवाइकांनी ही घटना अपघात मानण्यास नकार दिला आहे. मृतकांचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी आरोप केला की हा अपघात नसून खून आहे. तसेच या मृत्यूला राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असल्याचे सांगत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दोन दिवसांपासून शोध सुरू असतानाच वरिष्ठ अधिकारी नांदुरा पोलीस स्टेशनला दाखल झाले आणि पोलिस यंत्रणेला अलर्ट करण्यात आले. याच दरम्यान मलकापूरचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी महामार्गालगतच्या विहिरी, नाले आणि झुडपांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौलासे व त्यांची टीम शोधात गुंतली. मलकापूर–वडनेर दरम्यान त्यांनी चार विहिरी तपासल्या आणि पाचव्या विहिरीत आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास कार दिसली. संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली.


























