बनली चौफुली मृत्यूची वाट! अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामस्थाचा अंत; प्रशासनाविरोधात संताप

उमराणे (वार्ताहर):
देवळा तालुक्यातील चिंचवे नि. गावाजवळ मुबंई आग्रा महामार्गांवरील मुख्य चौफुली आता अपघातांचे केंद्र नसून थेट ‘मृत्यूची वाट’ बनली आहे. बुधवारी (दि. १७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चिंचवे येथील रहिवासी वसंत महादू पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात नसून, ढिसाळ रस्ता व्यवस्था आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम असल्याचा संताप ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
कामानिमित्त बाहेरून घरी परतत असताना वसंत पवार हे चिंचवे येथील मुख्य चौफुलीवरील धोकादायक डिव्हायडर ओलांडत होते. त्याच वेळी चांदवडच्या दिशेने अतिवेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना अक्षरशः उडवले. डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. विशेष म्हणजे, अपघातानंतर बराच वेळ प्रशासनाचा पत्ता नव्हता, स्थानिक नागरिकांनीच तातडीने धाव घेत मदतकार्य केले.
जखमी पवार यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा कर्ता पुरुष कायमचा हिरावला गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातप्रवण चौफुलीवर मृत्यूचे साम्राज्य
चिंचवे येथील मुख्य चौफुली ही गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनली आहे. या परिसरात खालील गंभीर समस्या असूनही प्रशासन डोळे मिटून बसले आहे:
* अंधाराचे साम्राज्य: मुख्य चौफुलीपासून गावाच्या दिशेने सुमारे दीड किलोमीटरचा परिसर पूर्णतः अंधारात आहे.
* सुरक्षेचा अभाव: वेग नियंत्रणासाठी कोणतेही स्पीड ब्रेकर, सूचना फलक किंवा सिग्नल यंत्रणा नाही.
* प्रशासनाचे दुर्लक्ष: सोमा कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नुकसान भरपाईची आणि आंदोलनाची मागणी
या घटनेनंतर चिंचवे परिसरात तीव्र संताप उसळला आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे एका कर्त्या व्यक्तीचा बळी गेल्याने मयत वसंत पवार यांच्या कुटुंबाला शासनाने आणि संबंधित रस्ते कंपनीने तात्काळ मोठी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच, या ठिकाणी तातडीने स्ट्रीट लाईट बसवावेत आणि कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात; अन्यथा मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *