पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा शहराच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र ग्रामीण बँक असूनही ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्याऐवजी सततची खोळंबा व गैरसोय सहन करावी लागत आहे. बँकेत वारंवार कधी कॅश उपलब्ध नसते तर कधी नेटवर्क ठप्प होते. त्यामुळे बँकेसमोर व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या रांगा लागतात दिवसभरात अनेकांना हातची कामे राहून परत फिरावे लागत असल्याने नाराजी वाढली आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की, “बँकेत येतो तेव्हा कधी कॅश संपलेली असते, कधी इंटरनेट बंद असते. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने अंगावरच येते. ही परिस्थिती जवळपास रोजचीच झाली आहे.” बँकेसमोर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहकांना आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करावी लागतात. त्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी, अडथळा व गोंधळाचे वातावरण निर्माण होते. विशेषतः सकाळ व दुपारच्या वेळी रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत असून नागरिकांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांच्या मते, बँकेसमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची रुंदी कमी होते, दोन्ही बाजूंनी वाहने अडकतात आणि लहान अपघातांची प्रमाणही वाढले आहे. अनेक वेळा पादचाऱ्यांना रस्त्यातून जाणे कठीण होते.सततची वाहतूक कोंडी, बेताल पार्किंग, बँकेसमोरची गर्दी या सर्वामुळे बँक परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांच्या मते, एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तातडीची वाहतूक पुढे सरकवणे अवघड होईल.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज वारंवाराच्या कॅश-नेट तुटवडा, सेवा ठप्प होणे आणि पार्किंगचा प्रश्न या सर्वांवर बँक व्यवस्थापनाने व स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहक करत असून बँक व्यवस्थापनाला याचा फारसा फरक पडत नसल्याचीही खंत व्यक्त करण्यात येत आहे.
*पाटोद्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक असून अडचण नसुन खोळंबा कधी कॅश नसते तर कधी नेट पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहक त्रस्त*

























